IPL 2021 : कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) (IPL 2021) १४ व्या पर्वातील पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभव सहन करावा लागला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबईवर विजय मिळवला. त्यामुळं मंगळवारी होणार दुसरा मुंबई विरुद्ध कोलकाता ह्या सामन्यात तरी मुंबई जिंकेल अशी आशा क्रिकेटप्रेमी व मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईला (mumbai indians) २०१२ नंतर एकाही हंगामात पहिली लढती जिंकता आलेली नाही. शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धही त्यांना अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला. मात्र ५ वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला झोकात पुनरागमन करण्याची कला अवगत आहे.

दुसरीकडे कर्णधार ईऑन मॉर्गनच्या कोलकाताने बलाढ्य सनरायजर्स हैदराबादला नमवले. गेल्या २ वर्षांत बाद फेरीची संधी हुकलेला कोलकाताचा संघ या वेळी अधिक समतोल वाटत आहे. युवा भारतीय फलंदाजांसह चेन्नईतील खेळपट्टीसाठी पोषक असे अनुभवी फिरकीपटूही त्यांच्या ताफ्यात आहेत.

नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक आणि वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा या भारतीय खेळाडूंवर कोलकाताची प्रामुख्याने मदार आहे. शुभमन गिलला सातत्याने फलंदाजी करावी लागणार आहे. पॅट कमिन्स, मॉर्गन, रसेल या विदेशी त्रिकुटाला वैयक्तिक कामगिरीवर लक्ष द्यावे लागेल. हरभजन सिंग, वरुण च्रकवर्ती आणि शाकिब अल हसन या प्रभावी फिरकीपटूंमुळे कोलकाता मुंबईवर वरचढ ठरू शकतो. मॉर्गनचे कल्पक नेतृत्व कोलकातासाठी मोलाचे ठरेल.

इंग्लंड विरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत सातत्याने गोलंदाजी केल्यावर हार्दिक पंड्याचा खांदा काहीसा दुखावला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या फिजिओने दिलेल्या सल्ल्यानुसार तो पुढील काही लढती गोलंदाजी करणे टाळून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्याच्या खांद्यावर अतिरिक्त भार येऊ न देण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवले आहे, अशी माहिती मुंबईचा क्रिकेट संचालक झहीर खानने दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या