आयपीएल जिंकणार कोण? मुंबईचा वडापाव की पुण्याची मिसळ!

आयपीएल-10 च्या निर्णायक लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी अंतिम लढत रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पुणे सुपरजायंटने तीनवेळा मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे. पहिल्या क्वालिफाय लढतीत पुण्याने मुंबईवर मात करून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे अंतिम सामन्यात पुणे जिंकणार की मुंबई याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

मुंबईने केकेआरला नमवून चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने यापूर्वी दोनवेळा जेतेपद तर एकदा उपविजेतेपद पटकावले आहे. यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स पुण्याविरुद्ध होणार्‍या अंतिम सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ असल्याने अंतिम सामना चांगलाच रंगतदार होणार आहे. यंदाच्या मोसमातही मुंबईने सोळापैकी अकरा सामने जिंकून सर्वाधिक विजय साजरे करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच पुण्यानेही 10 सामने जिंकले आहेत. त्यातच महेंद्रसिंग धोणीसारखा हुकमी एक्का पुण्याकडे असल्याने सामना कोणत्याही क्षणी स्वत:कडे खेचून आणण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे मुंबईचा वडापाव जिंकणार कि पुणेरी मिसळ याची उत्सुकता आता ताणली गेली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या