क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाणारी मुंबई गुरुवारी देशातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेत ऐतिहासिक सामना खेळणार आहे. सर्वात जुन्या असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघ आपला 500 वा सामना खेळणार आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा मुंबई संघ 500 वा रणजी सामना खेळणारा एकमेव पहिला संघ ठरला आहे. हा सामना मुंबईकरांसाठी विशेष आणि उत्सुकतेचा ठरणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे, अशी माहिती बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात दिली.
यावेळी शरद पवार तसेच एमसीए अध्यक्ष आशिष शेलार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अजित वाडेकरसह अनेक क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.
गुरुवारी होणाऱ्या सामन्यात मुंबईकर क्रिकेटप्रेमी तसेच मुंबई संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. बडोदा विरुद्ध होणाऱ्या या सामन्यात मुंबई संघ आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली सज्ज झालेला आहे. रणजी स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मुंबई संघाला बडोदाविरोधातील सामना देखील जिंकून राहणारच या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. त्यांच्या या जिद्दीमुळे अनेक अशक्य असे सामने त्यांनी सहजपणे जिंकलेले आहेत.
यावेळी आपले मत व्यक्त करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला, 'मुंबई रणजी संघाने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट खेळाडू दिले आहेत. या स्पर्धेमुळे देशातील सर्वोत्तम खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे आमचे खेळाडू खूप काही शिकले आहेत. त्यांच्या शानदार कामगिरीमुळे मुंबई संघाने आज आपला दबदबा निर्माण केला आहे', असे सांगत मुंबई रणजी संघाचे कौतुक केले.
मुंबई रणजी संघाचा कर्णधार आदित्य तरे याने देखील यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले,'बडोदा विरुद्ध होणारा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. क्रिकेटमधील एका सर्वोत्तम संघासाठी 500वा सामना खेळणे म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्ही स्वतःला नशीबवान समजतो. यासाठी मुंबई संघाचा सहभाग असलेल्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो'.