एका हर्बल कंपनीच्या कार्यालयातील मॅनेजरला बांधून ठेवत ९.५० लाखांची जबरी चोरी झाल्याचा प्रकार पवई परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्ली येथून दोघांना अटक केली आहे. रेहमत मोहमद अली (२१) आणि शिवकुमार प्रताप सिंग अशी या दोघा आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ६.३५ लाखांची रोकडही हस्तगत केली आहे.
रेहमत अली हा पूर्वी त्या हर्बल कंपनीतच कामाला होता. सहा महिन्यांपूर्वी काम सोडल्यानंतर त्याने चोरीचा हा कट रचला. चोरीच्या दिवशीच दोघे मुंबईत दाखल झाले होते. चोरी केल्यानंतर त्याच दिवशी हे दोघेही दिल्लीला परतले.
आयआयटी, पवई येथील भवानी इंडस्ट्रीअल इस्टेटमधील उदय ई-कॉमर्स येथे मॅनेजर पदावर असलेला सुमित राठोड (२२) हा आठवडाभर जमा होणारी त्याच्याकडील रक्कम रविवारी जमा करतो. नेहमीप्रमाणे रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी सुद्धा तो त्याच्याकडे जमा झालेली ९.५० लाख रुपयांची रक्कम बॅगेत भरून जमा करण्यासाठी निघाला होता. तो बाहेर निघत असतानाच तोंडावर बुरखा घातलेल्या दोघांनी त्याच्या कार्यालयात घुसून, त्यांना बांधून ठेवत त्यांच्याकडील रोकड घेवून तेथून पोबारा केला.
पोलिसांनी आसपासच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज ताब्यात घेवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना हे दोन्ही आरोपी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पवई पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक देसाई यांचे एक पथक दिल्लीला पाठवून, आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींवर भा.दं.वि कलम ३४२, ३९२, ४५२, ५०४, ३४ नुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.