वांद्र्यात १९ मजल्यावरून ऊडी घेत तरुणाची आत्महत्या

इमारतीच्या १९व्या मजल्यावरून उडी घेत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली आहे. राजेंद्र केदारे (३२) असं या तरुणाचं नाव असून तो त्याच परिसरातील रहिवासी होता. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती खेरवाडी पोलिसांनी दिली आहे.

नक्की घडलं काय?

शास्त्रीनगर येथे राहाणारा राजेंद्र शुक्रवारी सकाळी त्याच्या घरासमोर असलेल्या 'आकृती ३' या इमारतीत गेला. या इमारतीत त्याचे नातेवाईक राहातात. मात्र, त्यांच्याकडे न जाता तो थेट इमारतीच्या गच्चीवर गेला आणि तिथून उडी घेत त्याने आत्महत्या केली. राजेंद्र टेरेसवर चढल्याचं समजताच स्थानिकांनी पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला याची माहिती दिली. मात्र, त्यांनी यायला उशीर केल्यानंच राजेंद्रचा मृत्यू झाला असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

का केली आत्महत्या?

राजेंद्र केदारेला दारूचं व्यसन असून त्याच्यावर उपचार देखील सुरू असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्यावर अंधेरीच्या गोयल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. 

पुढील बातमी
इतर बातम्या