भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलीय. या शिक्षेला नेदरलँडच्या हेग शहरातील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिलीय. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलेय.
आंतराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय एक प्रकारे भारताचा विजयच आहे. या न्यायालयात यशस्वीपणे भूमिका मांडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार व्यक्त करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायनमधील एका कार्यक्रमात सांगितले.
कुलभूषण जाधव यांच्यावर 'रॉ' या संस्थेचा हेर असल्याचा आरोप लावत ३ मार्च २०१६ मध्ये त्यांना बलुचिस्तान प्रांतातून अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केलाय.
मात्र, कुलभूषण जाधव व्यावसायिक कामानिमित्त इराणला गेले होते. त्यांचे इराणमध्ये अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांना पाकिस्तानच्या सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे भारताचे म्हणणे आहे.