राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचे संकट दूर राहण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक नागरिक याला हरताळ पाळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतच आहे. कोरोना व्हायरसची मुंबईत 14 हजार 781 जणांना आत्तापर्यंत लागण झाल्याचं समोर आले. मात्र अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाही. मुंबईत संचार बंदीचे उल्लघंन करणाऱ्या अशा 11 हजार 880 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.
नियम पायदली तुडवणाऱ्यांमध्ये दुकानदार आणि विक्रेत्यांची ही कमी नाही. मध्य मुंबईत विक्रेते आणि दुकानदारांची संख्या सर्वाधिक आहे. मध्य मुंबईत पोलिसांनी आतापर्यंत 1764 जणांवर गुन्हे नोंदवलेले आहे. त्या खालोखाल पश्चिम मुंबईत गुन्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे. पश्चिम मुंबईत 1522 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवलेले आहेत. त्याच बरोबर दक्षिण मुंबईत 665, उत्तर मुंबईत 1195 गुन्हे पोलिसांनी विक्रेते आणि दुकानदारांवर नोंदवलेले आहेत. ज्यामध्ये 59 हाॅटेलवाले, 42 पान टपरी, 251 किरकोळ दुकाने, 3931 सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे, 951 अवैध्य वाहतूकचा समावेश आहे. मुंबईत आतापर्यंत या महामारीने 556 जणांचा बळी घेतलेला आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतले अनेक भाग सील करण्यात आलेत. एवढं सगळं होत असताना नागरिक मार्केटमध्ये गर्दी करत आहेत.