गेल्या तीन महिन्यांत राज्यभरात 1085 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’ (NCCRP) आणि मदत क्रमांक 1930 वर गेल्या तीन महिन्यांत 62 हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
मुंबई (mumbai) वगळता संपूर्ण राज्यातून या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात तत्काळ कारवाई करून सायबर फसवणुकीतील 119 कोटी रुपये वाचविण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आले आहे.
महाराष्ट्र (maharashtra) सायबर विभागाच्या (cyber crime) मदत क्रमांक 1930 वर मुंबई वगळून राज्यातील इतर विभागांतून सायबर तक्रारी प्राप्त होत असतात. त्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे आत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे.
त्यात 150 हून अधिक कर्मचारी व सायबर तज्ज्ञ 24 तास कार्यरत असतात. या मदत क्रमांकावर दररोज सरासरी आठ हजार दूरध्वनी येतात. या सर्व दूरध्वनींना प्रतिसाद दिला जातो. तसेच तक्रारी सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाहीही करण्यात येते, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे अधीक्षक संजय लाटकर यांनी दिली.