वादग्रस्त चित्रपटांसोबतच विधानांमुळेही नेहमी चर्चेत राहणाऱ्या दिग्दर्शक अनुराग कश्यपला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
देशभरात घडत असलेल्या लिंचींग (Mob Lynching) म्हणजे झुंडबळीच्या घटनांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गजांनी पत्र लिहिलं होतं. देशभरातील आघाडीच्या सेलिब्रिटीजसोबत दिग्दर्शक अनुराग कश्यपनंही या पत्राला पाठिंबा दर्शवला होता. यामध्ये मणिरत्नम, रामचंद्र गुहा आणि अदूर गोपालकृष्णन यांसारख्या प्रसिद्ध विचारवंतांचा समावेश होता. अनुरागनं हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं. त्यानंतर एका युजरनं ट्विटरच्या माध्यमातून अनुरागला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या पत्रानंतर कंगना रणौत, मधुर भांडाकर, विवेक अग्निहोत्री, प्रसून जोशी, शास्त्रीय नृत्यांगना व खासदार सोनल मानसिंह, पं. विश्वमोहन भट्ट यांच्यासह ६१ दिग्गजांनी आणखी एक पत्र लिहून पंतप्रधानांना पाठिंबा दर्शवला आहे.
अनुरागला मिळालेली धमकी इतरांसाठीही धोक्याची घंटा ठरू शकते. या प्रकरणाची गंभीर दखल सायबर पोलिसांनी घेतली असून, या विरोधात योग्य कारवाई सुरू केल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.