'अल कायदा’चं लक्ष्य मुंबईवर, गुप्तचर खात्याचा हाय अलर्ट!

अल कायदा या दहशतवादी संघटनेकडून पुन्हा एकदा मुंबईला लक्ष्य केलं जाणार असल्याची माहिती गुप्तचार विभागाला मिळाली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडून या महिन्यात शॉपिंग मॉल, फाइव्हस्टार हॉटेल किंवा सरकारी कार्यालयांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा दिला आहे. सार्वजनिक सभा व राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये अतिमहत्त्वांच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचाही इशारा दिल्याने मुंबईत कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे

मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यातच जम्मू-पठाणकोट महामार्गावरून जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवाद्यांनी इनोव्हा कार पळवून नेल्यामुळे दिल्ली व पंजाबमध्ये हालअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हे दहशतवादी मुंबईलाही लक्ष्य करू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या दहशतवाद्यांकडून समुद्रकिनारे, रेल्वे स्टेशन, विमानतळावर आत्मघाती हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून जागता पहारा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गुप्तचर खात्याकडून आलेल्या या इशाऱ्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी राज्य पोलिसांनी हाय अलर्ट जारी केल्याची माहिती गृह विभागाकडून देण्यत आली आहे.

लक्ष्य आणि लक्ष

मुंबईसह महाराष्ट्रातील संरक्षण दलाची महत्त्वाची कार्यालये व केंद्र, महत्त्वाची धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये, गजबजलेली मार्केट, हॉटेल, रेल्वे स्टेशन, शॉपिंग मॉल, चित्रपटगृहांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमात किंवा मोर्चाच्या काळात महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अल कायदाच्या या अतिरेक्यांना स्थानिक पातळीवर किंवा असामाजिक तत्त्वांकडून मदत मिळू शकते. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या तसंच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्रीय गुप्तचर खात्याने दिल्या आहेत.


हेही वाचा-

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बाॅलीवूडच्या कोरिओग्राफरला अटक

EXCLUSIVE: सागरी सुरक्षेसाठी पोलिसांना अत्याधुनिक 'इमिजिएट सपोर्ट व्हेईकल' बोटी


पुढील बातमी
इतर बातम्या