राज्यात 'मरकज' मधून परतलेल्या 25 जणांना कोरोना

कोरोना संसर्गाचे प्रमुख केंद्र बनलेल्या दिल्लीतील ‘तब्लीगी जमात’च्या धार्मिक संमेलनात सहभाग घेऊन परतलेल्या राज्यातील 1062 पैकी 890 जणांची ओळख पटवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. या तब्लिगींच्या तपासणीत त्यांच्यातील 25 जणांचे रिपोर्ट पाँझिटीव्ह आलेले आहे. यातील 576 जणांना विलगीकरण कक्षात ठेवले असून इतरांच्या वैद्यकिय चाचण्याचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे. यातील बेपत्ता तब्लीगींचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे. या यादीनुसार मुंबई पोलीस सुमारे 55 व्यक्तींचा शोध घेत आहेत, अशी माहिती मिळते.

पोलीस मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तब्लीगी जमातचे धार्मिक संमेलनात राज्यातून 1062 जण गेल्याचे निदर्शनास आले आहे. 13 ते  15 मार्चला दिल्लीतील निजामुद्दीन भागातील केंद्रात(मरकज म्हणजे केंद्र)  येथे हे संमेलन पार पडले. या संमेलनाला देशाच्या सर्वच राज्यांमधील व्यक्तींची उपस्थिती होती. केंद्रीय यंत्रणांनी त्या दिवशी तेथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचा 'डंप डाटा' मिळवला आहे. जे या संमेलनात ज्या ज्या राज्यातून सहभागी झाले होते. त्या त्या राज्यानुसार  केंद्रीय यंञणेने त्या राज्याला माहिती पुरवली. त्यात महाराष्ट्रातून 1062 जण या संमेलनाला गेली होती.

डंप डाटानुसार पोलिसांनी त्यातील 890 जणांची ओळख पटवली  असून आरोग्य विभागाने त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यातील 576 जणांना तातडीने विलगीकरण कक्षात हलवत त्यांची तपासणी केली असता. त्यातील 4 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागन झाली असून  यातील 2 अहमदनगर तर 2 पिंपरी चिंचवडचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. माञ या चौघांकडून राज्यातील इतर 21 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आता पुढे आले आहे. आता हे बाधित रुग्ण ज्या कुणाच्या संपर्कात होत. त्याचा शोध सुरू आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाचे रुग्ण तपासण्यासाठी आरोग्य विभागाने तब्बल 2332 टिम तयार केल्या आहेत. त्यात राज्यातील तीन प्रमुख शहरात या टीमची संख्या सर्वाधिक म्हणजेच  मुंबईत 292, पुणे 373, नागपूर 210 टीम बनवण्यात आल्या आहेत. या टीम नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोनाची तपासणी करत आहेत.
पुढील बातमी
इतर बातम्या