महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रेल्वेप्रवासाबाबत लवकरच निर्णय- उदय सामंत

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. सोमवारी याबाबत त्यांनी माहिती दिली असून, वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्याबाबतचा निर्णय ५ मार्चनंतर घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोनामुळे बंद असलेली पदवी महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, मुंबईतील उपनगरात व ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपनगरी गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा नाही. सर्वांसाठी मुभा असलेल्या दुपारी १२ ते ४ आणि सकाळी ७ वाजताच्या आधी विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांसाठीच्या वेळेत प्रवास करता येणार आहे.

मात्र, महाविद्यालयांच्या वेळापत्रकांचा प्रश्न असून विद्यार्थ्यांना पूर्ण दिवसभर प्रवासाची परवानगी मिळाल्याखेरीज महाविद्यालय गाठणं व घरी परतणं शक्य नाही. त्यामुळं या अडचणींबाबत मुख्य सचिवांशी चर्चा झाल्याचं सामंत यांनी पत्रकारांना सांगितलं. महाविद्याविद्यालयांच्या वेळेत विद्यार्थ्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे.

महाविद्यालये जरी सुरू होत असली तरी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण असून, त्याबाबत ५ मार्चनंतर निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार वसतिगृहातील एका खोलीत एकाच विद्यार्थ्यांला राहता येईल. हे कठीण असून काही वसतिगृहे करोना रुग्णांना अलगीकरण केंद्र म्हणून वापरण्यात येत आहेत. १५ फेब्रुवारीनंतर विद्यार्थी व महाविद्यालयांचा प्रतिसाद पाहून वसतिगृहांबाबत निर्णय घेणार असल्याचे सामंत यांनी नमूद केले.

महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के क्षमतेने तर ५ मार्चनंतर १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, असे सामंत यांनी नमूद केले. शुल्कवसुलीसाठी महाविद्यालये सुरू होत असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. पालकांच्या तक्रारी व अडचणी असतील, त्या सोडविल्या जातील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या