विध्यार्थ्यांना दिलासा! एकाच पुस्तकात ४ विषय

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२-२०२३ शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १लीच्या अभ्यासक्रमातील ४ विषयाचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे पहिल्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे.

सुरुवातीला ही पद्धत इयत्ता १लीसाठी असेल, त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाईल. यानुसार, इयत्ता १लीमध्ये शिकवले जाणारे चार विषय - इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिक; प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले गेले आहेत.

प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक वेगळे घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग १, २, ३ किंवा ४ असे, फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणे आवश्यक आहे.

'सध्या इयत्ता पहिलीचा विद्यार्थी, जो सुमारे ६ वर्षांचा आहे, त्याच्या बॅगेत किमान ८३० ग्रॅम इतके पाठ्यपुस्तकांचे वजन असते. यामध्ये पाण्याची बाटली, डब्बा आणि पुस्तकांचे वजन जोडल्यास बॅगेचे वजन १ किलोग्रॅमच्या पुढे जाते. परंतु नव्या पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकांचे वजन २१० ग्रॅमपर्यंत कमी होते. प्रायोगिक तत्त्वावर, ४८८ मॉडेल स्कूलमध्ये पुस्तके सादर करण्यात आली आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे', असं बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी म्हटलं.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक आणले जाईल. त्यानंतर इयत्ता दुसरी आणि अशाच प्रकारे केले जाईल.

नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर त्यात आवश्यक बदल देखील करण्यात येतील. आम्हांला हे पाठ्यपुस्तक वापरणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मिळाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या