कानिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या पेपर तापसणीवरील बहिष्कार मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे निकाल वेळेत लागेल की नाही या विचाराने त्रस्त झालेले बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सुटकेचा निः श्वास सोडला आहे.
विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्य सरकारची चर्चा सुरु होती. यापूर्वीच शिक्षकांच्या काही मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. त्यातच सोमवारी झालेल्या चर्चेअंती अन्य काही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. तर उर्वरित मागण्या अर्थ विभागाशी संबंधित असल्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा करून त्या सोडवण्याचं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे.
शिक्षक महासंघाच्या हाती मान्य झालेल्या मागण्यांचे आदेश पडले आहेत. त्यामुळे बहिष्कार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.
विद्यार्थी हितासाठी शिक्षण मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर महासंघाचे पेपर तापसणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आले अाहे. पेपर तपासणीच्या कामाला तातडीने सुरूवात करण्यात येत आहे व इयत्ता १२ वी चा निकाल वेळेवरच लागेल.
- अनिल देशमुख, अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ