आरटीई प्रवेशाला ३ मार्चपासून सुरुवात

आरटीई प्रवेशाला ३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी आरटीईअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला ३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.  

राज्यातील सर्व शाळांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची तारीख जाहीर केली. ३ ते २१  मार्चपासून पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. https://rte25admission.maharashtra.gov.in आणि https://student.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरून पालकांना आरटीई प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे.

आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून ९४३१ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये ९६ हजार ८०१ जागा आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतून आरटीई प्रवेशासाठी ३५२ शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये २९० शाळा एसएससी बोर्डाच्या आहेत. तर ६२ शाळा अन्य बोर्डाच्या आहेत. ३५२ शाळांमध्ये ६४६३ जागा आहेत. यामध्ये प्री प्रायमरी वर्गाच्या ४८२ जागा आहेत.  एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये ४१८ तर अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये ६४ जागा आहेत. तर पहिलीच्या वर्गासाठी एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये ४८०९ तर अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये ११७२ अशा ५९८१ जागा आहेत.

आरटीई प्रवेशासाठी उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी पालकांकडून विभागाला वारंवार विचारणा होताना दिसून येत आहे. यातूनच यंदा आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत अर्जांची संख्या वाढणार आहे. गतवर्षी ३१ हजारांवर पालकांनी अर्ज केले होते. यावर्षी ती वाढणार असल्याची शक्यता आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या