विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केल्याबद्दल राज्यातील १२ हजारांहून अधिक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना अभिनंदनपत्र पाठवले जाणार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या स्वाक्षरीने जारी होणाऱ्या या अभिनंदनपत्रांमध्ये संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या क्रियाशील नेतृत्वाचं कौतुक करण्यात येणार आहे.
'सरल'च्या नवीन अहवालानुसार राज्यातील १२ हजार १५३ शाळा प्रथम भाषा आणि गणित विषयामध्ये प्रगत दिसून येत आहेत. शासनाने यावर्षी मूलभूत क्षमतेत किमान ७५ टक्के आणि वर्गानुरुप क्षमतेत किमान ६० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला प्रगत समजण्याचे निकष ठरवले आहेत. त्यानुसार प्रथम भाषा/गणित विषयात प्रगत ठरलेल्या सदर शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचे अभिनंदन करणारं पत्र शिक्षणमंत्र्यांकडून दिलं जाणार आहे.
यापैकी अनेक शाळांनी १०० टक्के विद्यार्थ्यांचे गुण नोंदवलेले नाहीत, अशा शाळांना २५ डिसेंबर २०१७ पूर्वी आपल्या १०० टक्के विद्यार्थ्यांची गुणनोंदणी करावी लागणार असल्याची सूचना राज्यातील शाळांना मूल्यमापन विभाग पुणे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा