मुंबईतील वाहिन्यांना लगाम लावणे गरजेचे - रमेश देव

प्रसिद्धी शिवाय कोणताही चित्रपट चालू शकत नाही. तसेच प्रसिद्धी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहिन्यांना पैसे द्यावे लागतात. मात्र हे शक्य नसल्याने अनेक चित्रपट चालत नाहीत. त्यामुळे मुंबईतील वाहिन्यांवर भाजपा सरकाराने लगाम लावणे गरजेचे असल्याचे मत अभिनेता रमेश देव यांनी भाजप सिने, टीव्ही, नाट्य संघ आणि भाजपा जनरल मजदूर संघ याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त व्यक्त केलं. दादर क्लब सभागृहात हा उद्धाटन सोहळा पार पडला.

चित्रपट इंडस्ट्री आणि इतर इंडस्ट्रीज मध्ये फरक आहे. चित्रपट क्षेत्रात काम करणारे कलाकार, दिग्दर्शक, स्पॉट बॉय, तंत्रज्ञ आदी पडद्यामागच्या कलाकारांचे अनेक प्रश्न आहेत. तर चित्रपट क्षेत्रात काम करणारी ही मंडळी मुंबई बाहेरून येत असतात. त्यांच्या रहाण्याचा, प्रात:र्विधी, खानपान, शुटिंगमुळे अवेळी प्रवास हे सर्व प्रश्न आम्हाला डोंगराएवढे वाटावेत असेच आहेत. मात्र हे सर्व प्रश्न खात्रीने भाजपा सरकार सोडवेल असा विश्वास देखील रमेश देव यांनी व्यक्त केला.

चित्रपट क्षेत्राचे काम मोठे आहे. परंतु या सृष्टीला अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. ते स्थिर करण्यासाठी 100 टक्के झोकून काम करेन असे आश्वासन भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिले. सेवक म्हणून काम करण्याची भूमिका ठेवल्यास या संघटनेचा पाया मजबूत राहील. त्यामुळे प्रत्येक कलाकाराचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे असा सल्ला संघटना प्रमुखांना शेलार यांनी दिला.

बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर संघर्ष करून सत्ता मिळवणारे भाजपा सरकार आहे. त्यामुळे सर्व स्तरावरील कलाकारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करेल. त्याचप्रमाणे कामगार वर्गाबरोबर निर्मात्यांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी ही संघटना निश्चित प्रयत्न करेल असे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दिग्दर्शक, लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांनी स्पष्ट केले. यावेळी मिलिंद तुळसकर, सुनील गणाचार्य, निवेदिता बासू, राज सूरी, अभिनेता पंकज विष्णू, अमर पावले, जितेंद्र राऊत आदी चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि कामगार वर्ग उपस्थित होता.

पुढील बातमी
इतर बातम्या