'आम्ही दोघे राजा राणी' स्टार प्रवाहची नवी मालिका

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - स्टार प्रवाहावर 'आम्ही दोघं राजा राणी' या मालिकेतून एका गोड जोडीची लोभस प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १४ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता ही मालिका सुरू होणार आहे. पार्थ आणि मधुरा दोघं आपापल्या अतरंगी कुटुंबासोबत राहतात. एकत्र कुटुंबात वाढणाऱ्या त्यांचे आपल्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे. पण त्यांचे नमुनेदार कुटुंबिय या दोघांच्या प्रेमकहाणीत जबरदस्त तडका देणार आहेत. अतिशय मनोरंजक असं कथानक तितक्याच खुमासदारपणे मांडण्यात आलं आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह पहावी अशी ही रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. संगीता राकेश सारंग यांच्या 'कॅम्सक्लब'ने या मालिकेची निर्मिती केली आहे. विजय पटवर्धन, समीर चौघुले आणि अभिजित पेंढारकर यांनी मालिकेचं लेखन केलं असून, संचित वर्तक दिग्दर्शन करत आहेत. मंदार कुलकर्णी, दीप्ती लेले या देखण्या गोंडस जोडी सोबत मिलिंद फाटक, विनय येडेकर, मैथिली वारंग, सुलेखा तळवलकर,शीतल शुक्ल आदी विनोदी अभिनायात मुरब्बी कलाकार यातील भूमिका साकारत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या