उकाड्याच्या काहिलीवर मुंबईकरांना शुद्ध हवेची फुंकर

एप्रिल महिना सुरू होताच मुंबईसह संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा दिवसागणिक चढतच आहे. विशेषत: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तापमान आणखी वाढले असून वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकरांची काहिली होत आहे. मात्र या असह्य उकाड्यातही निसर्गाने मुंबईकरांवर शुद्धतेची फूंकर घातली आहे. मुंबईच्या वातावरणाबाबत होत असलेल्या परिक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी 14 एप्रिल रोजी मुंबईकरांना या वर्षात दुसऱ्यांदा सर्वात जास्त शुद्ध हवा मिळाली आहे.

मुंबईच्या वातावरणाबाबत सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी व्हेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (एसएएफएआर)कडून सातत्याने परिक्षण आणि संशोधन केले जाते. या संस्थेच्या अहवालानुसार शुक्रवारी १४ एप्रिल रोजी मुंबईकरांना या वर्षात दुस-यांदा सर्वात जास्त शुद्ध हवा मिळाली असुन आठवडाअखेर पर्यंत अशीच शुद्ध हवा मिळणार आहे. मुंबईत वा-यांचा वाढलेला वेग, तापमान तसेच दमटपणात झालेली वाढ यामुळे वातावरणातील प्रदुषणाचे प्रमाण कमालीचे खाली आले आहे.

मुंबईतील चेंबूर आणि माझगाव हे सर्वात जास्त प्रदूषीत भाग आहेत. मात्र एसएएफएआरने शुक्रवारी केलेल्या परिक्षणात या दोन्ही भागांतील प्रदुषणाचे प्रमाण सामान्य पातळीवर असल्याचे आढळून आले आहे. या आठवडा अखेरीस दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक वेधशाळेने दिला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या