महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, जोरदार पावसानंतर शहरातील विविध भागांत झाडे पडल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. अनेक ठिकाणी उन्मळून पडलेल्या झाडांमुळे रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने नुकसानग्रस्त झाली. तर काही ठिकाणी घरांवर झाडे आणि फांद्या पडल्याने मालमत्तेचेही नुकसान झाले.
घटनांची माहिती मिळताच महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. रस्त्यांवरील पडलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम केले.
मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने आणि काही रस्ते झाडे पडल्यामुळे बंद झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. नागरिकांनी अतिवृष्टीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
India Meteorological Department (IMD) ने मुंबई महानगर प्रदेशासह ठाणे जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जोरदार वाऱ्यांसह झाडे पडणे, स्थानिक पातळीवर पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे आणि वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या घटनांमध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नसली तरी मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आवश्यक तेथे मदत आणि सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मान्सून काळात हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा