२०१८ला 'नो हॉर्न प्लिज'चा संकल्प!

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • पर्यावरण

आवाज फाउंडेशनने २൦१८ या वर्षात ध्वनीप्रदूषणाचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी पुढाकार घेतला आहे. 'आवाज फाउंडेशन' ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ध्वनीप्रदूषण या विषयावर अभ्यास करत आहे. आता या संस्थेनं राज्य वाहतूक विभाग आणि मुंबई पोलिस यांच्या सहकार्याने मौनव्रतसारखीच 'हॉर्नव्रत' अशी एक मोहीम राबवली.

'नो हॉर्निंग ईयर'

आवाज फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, मुंबईसारख्या शहरात एका तासाला १८ दशलक्ष वेळा मोठ-मोठ्याने हॉर्न वाजवले जातात. शिवाय, वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरात सध्या ३ दशलक्ष वाहनं आहेत. त्यामुळे दिवसाला होणारा आवाजही त्याच्या तुलनेत जास्तच आहे. म्हणूनच 'हॉर्नव्रत' ही मोहीम राबवत असल्याचं आवाज फाउंडेशनच्या संयोजक सुमायरा अब्दुलाली यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, अनेकदा विनाकारण हॉर्न वाजवला जातो. त्याच्यावरही निर्बंध घालून महाराष्ट्र सरकारने २०१८ हे वर्ष 'नो हॉर्निंग ईयर' म्हणून घोषित करावं, असं आवाहनही आवाज फाउंडेशनतर्फे करण्यात आलं आहे.

'विनाकारण हॉर्न वाजवू नका'

'हॉर्नव्रत' या मोहिमेत आवाज फाउंडेशनने काही रिक्षा संघटनांचा समावेश केला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया इथे शनिवारी आवाज फाउंडेशनतर्फे एका रिक्षाला बरेचसे हॉर्न लावण्यात आले होते आणि त्यातून 'विनाकारण हॉर्न वाजवू नका', असा संदेश देण्यात आला होता. सोमवारपासून मुंबई शहरातील आवाज कसा कमी करता येईल, यासाठी काही रिक्षा चालक आवाज फाउंडेशनच्या सहकार्याने जनजागृती करणार आहेत.

ही रिक्षा सोमवारपासून जनजागृती करणार आहे. दक्षिण मुंबईतल्या महत्वाच्या भागांमध्ये पुढचे १० दिवस प्रवास करणार आहे. आणि त्यानंतर आम्ही पश्चिम आणि पूर्व उपनगरातील दिशेने जनजागृतीचा उपक्रम राबवणार आहोत. शिवाय, आम्ही कार्यालयीन क्षेत्र, मोठे निवासी संकुल तसंच शाळा आणि महाविद्यालयांनाही लक्ष्य करणार आहोत. यामुळे ध्वनीप्रदूषण कमी व्हायला मदत होणार आहे.

सुमायरा अब्दुलाली, संयोजक, आवाज फाउंडेशन

पुढील बातमी
इतर बातम्या