भविष्य वाचवण्यासाठी शाळकरी मुलांचा पुढाकार!

आजची लहान मुले हीच उद्याच्या देशाचे भवितव्य आहेत. जर त्यांना आज सरळ मार्ग दाखवला गेला तरच ते पुढे जाऊन देशाचे भविष्य उज्ज्वल करू शकतील. असाच पुढाकार मुंबईतल्या बोरिवलीतील के. जे. बी. सी. एन. इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने घेण्यात आला आहे. या शाळेने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक अनोखी जबाबदारी हाती घेतली आहे.

दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. मात्र मुंबईच्या बोरिवलीतील के. जे. बी. सी. एन. इंटरनॅशनल स्कूलने एक अनोखी मोहीम राबवली आहे. यामध्ये शाळेतील कोणताही कर्मचारी किंवा विद्यार्थी बॉलपेन वापरणार नाही, तर फाऊंटन पेन वापरण्यावर जोर दिला जात आहे. प्लॅस्टिकच्या पेनचा वापर थांबवणे हा यामागचा उद्देश आहे. प्लॅस्टिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. विद्यार्थ्यांना फक्त परिक्षेत चांगले गुण मिळणे महत्त्वाचे नसते, त्यांच्या ज्ञानातही भर पडली पाहिजे असे शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले.

याशिवाय शाळेने विद्यार्थ्यांच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्यावर बंदी आणत त्याऐवजी मेटलच्या बाटल्या वापरण्यास सांगितले आहे. शाळेचे वातावरण प्रदूषणमुक्त राहण्यासाठी आणि मुलांमध्ये पर्यावरणाविषयीची जागरुकता निर्णाण करण्यासाठी या शाळेने विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था देखील मदत करत असल्याचे बोलले जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या