पालघरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू, आठवड्यातील चौथा मृत्यू

पालघर (Palghar) जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणाजवळ वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. तलासरी पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणाजवळ बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना ही घटना घडली. सचिन जयराम कुवरा (वय २७), अतुल बाबु गोवारी (वय १८) अशी मृतांची नावं आहेत.

दरम्यान, ६ सप्टेंबरला डहाणू आणि वाडा तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला होता. डहाणू तालुक्यातील तवा इथं वीज कोसळून नितेश हाळ्या तुंबडा या २० वर्षीय तरुणाचा तर वाडा तालुक्यात शांताराम दिवा या तरुणाचा मृत्यू झाला होता. तर त्याच्या सोबतचे ५ तरुण जखमी झाले आहेत.

रविवारी ६ सप्टेंबर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. पावसापासून संरक्षणासाठी हे सर्व तरुण एका झाडाखाली थांबले. यावेळी सागर शांताराम दिवा या तरुणाच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर त्याच्या सोबतचे संदिप अंकुश दिवा (वय २५), अनंता चंद्रकांत वाघ (वय २४), रविंद्र माधव पवार (वय १८), नितेश मनोहर दिवा (वय १९) व सनी बाळु पवार (वय १८) हे जखमी झाले आहेत. जखमींना खानिवली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या