पुढचे चार दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार , हवामान खात्याचा इशारा

पुढचे चार दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे. गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. रविवारपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार (Heavy rains) तर काही जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाचा (Normal rains) इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः समुद्रकिनारच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनानं दिले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

सोमवारसाठी मात्र कुठलाही अलर्ट नसल्याचं सध्या सांगण्यात आलं आहे. हवामानाच्या सध्याच्या स्थितीनुसार पुढील आठवड्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. सध्या तरी महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये निसर्गाचं चक्र बिघडत असून कमी कालावधीत विक्रमी पाऊस पडण्याच्या घटना नोंदवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आणि कोकणातील काही भागात असाच काही तासात विक्रमी पाऊस घडल्याचं गेल्या आठवड्यात दिसलं.

पावसाची शक्यता पाहता समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि पावसात गरज असेल तरच घराबाहेर पडावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या