मुंबई - मुंबईत सध्या डेंग्यू-मलेरियासारख्या अाजारांनी थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर नवरात्री मंडपांमध्ये फवारणी व परिसरातील लोकांसाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे डेंग्यू व मलेरियाविषयक प्रतिबंधात्मक कार्यवाहीसह जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नवरात्र मंडपामधूनही जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत ५७० मंडपांमध्ये व आजूबाजूच्या परिसरात जनजागृती करण्यात आली.
डेंग्यू - मलेरियाचा प्रसार करणारे डास साचलेल्या किंवा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात. ही बाब लक्षात घेऊन नवरात्रीसाठी उभारण्यात आलेले मंडप व मंडपांच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचलेली ठिकाणे शोधण्यात येत असून, ती नष्ट करण्याची अथवा तिथे औषध फवारण्याची कार्यवाही तात्काळ केली जात आहे. तसेच या ठिकाणी धुम्रफवारणी देखील नियमितपणे करण्यात येत आहे.