नरिमन पॉइंट - द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षांचे मुंबईत ब्रँडिंग व्हावे या उद्देशाने द्राक्षभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून द्राक्षमहोत्सव हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांच्या मालाला लोकप्रियता मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. मनोरा आमदार निवास परिसरात आयोजित द्राक्ष महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
'द्राक्षउत्पादक मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने द्राक्षशेती करतो. तो माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे', असे यावेळी फुंडकर म्हणाले.
या महोत्सवाला आमदार सुमन पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार रामराव वडकुते, आमदार ख्वाजा बेग आणि आमदार बळीराम शिरस्कर आदी मान्यवरांनी भेट दिली. या वेळी मनिष औताडे, उद्धव साळुंखे, मल्हार टाकळे, पंकज मोहड, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.