कोरोना झालेल्या रुग्णांना लवकरच आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. ज्या रुग्णांकडे मोबाइल किंवा स्मार्टफोन नाहीत, त्यांना टॅबद्वारे नातेवाईकांशी संपर्क करून बोलणे करून देण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. रुग्णाला औषधांबरोबरच मानसिक आधार देण्यासाठी पालिका हा प्रयोग करणार आहे.
एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लग्न झाल्यास त्याला लक्षणं बघून निर्णय घेतला जातो. तीव्र लक्षणं असल्यास रुग्णालयात दाखल केलं जातं. परंतु, सौम्य लक्षणं असल्यास कोव्हीड सेंटरमध्ये अथवा रुग्णालयात किमान १० दिवस ठेवलं जातं. या काळात आजूबाजूला पीपीई किट घातलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांव्यतिरिक्त कोणीही दिसत नाही. नातेवाईकांशी संपर्क पूर्ण तुटतो. त्यामुळे रुग्ण शरीराबरोबरच मनानेही खचतो.
अशात ज्या रुग्णांकडे स्वत:चे मोबाइल नाहीत किंवा ज्यांना मोबाइल वापरता येत नाहीत, अशा रुग्णांना अधिकच एकटेपणा येतो. त्यामुळे महापालिकेने आता या रुग्णाचा नातेवाईकांशी संवाद व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.
महापालिकेच्या केईएम, नायरमध्ये परिचारिका किंवा वॉर्डबॉय हे आपल्या फोनवरून एखाद्या रुग्णाचे नातेवाईकांशी बोलणे करून देत आहेत. पण ज्यांच्याकडे मोबाइल नाही, त्यांच्यासाठी ही सोय देण्यासाठी प्रत्येक वॉर्डला एक टॅब देण्याचा विचार केला जात असल्याचं समजतं. टॅबमध्ये रुग्णांची सर्व माहितीही संकलित करता येईल व संभाषण करण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे.