राज्य सरकारच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी गोकुळदास तेजपाल रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात सातत्याने काम करतानाच सार्वजनिक आरोग्य सांभाळल्याने या रुग्णालयाचा विचार करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मुकुंद तायडे यांनी यावेळी दिली.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराने पहिल्यादांच सरकारी रुग्णालयाला गौरवण्यात आलं आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात सतत १५ वर्षे काम करणाऱ्या रुग्णालयाला किंवा संस्थेला या पुरस्काराने गौरवण्यात येतं. त्याप्रमाणे गोकुळदास तेजपाल रुग्णालयाची निवड करण्यात आली.
गोकुळदास रुग्णालय हे व्यसनमुक्ती विभाग म्हणून १९९७ पासून घोषित करण्यात आलं. तेव्हापासून सर्वाधिक काळ डाॅ. युसुफ माचीसवाला हे पथक प्रमुख राहिले आहेत.
हे दोन सरकारी व्यसनमुक्ती केंद्र
केईएम आणि जीटी हॉस्पिटल हे दोन सरकारी व्यसनमुक्ती केंद्र आहेत. यात केईएम हे पालिकेच्या अखत्यारित येणारे असून जीटी हाॅस्पिटल हे राज्य सरकारच्या अखत्यारितील रुग्णालय आहे.
दारू, तंबाखू, गांजा, एमडी, चरस, ब्राऊन शुगर ते अगदी इंटरनेटमध्ये गुुंंतलेले रुग्ण देखील जीटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असल्याची माहिती व्यसनमुक्ती विभाग सहयोगी प्राध्यापक डाॅ. सारिका दक्षीकर यांनी दिली. तर, उपचारासाठी दाखल रुग्णांसाठी क्राफ्ट, चित्रकला, इनडोअर गेम घेत असल्याची माहिती ज्येष्ठ परिचारिका कानरू आणि शामल उकीर्डे यांनी दिली.