'निपाह' या व्हारसने सध्या केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. वटवाघुळाच्या संक्रमणातून पसरणाऱ्या या अत्यंत घातक व्हायरसमुळे केरळमध्ये अनेकांचा जीव घेतला आहे. चिंतेची बाब म्हणजे या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही. त्यामुळे भारतात 'निपाह' व्हायरसच्या रुपाने नवं संकट समोर उभं राहीलं आहे.
केरळच्या कोझीकोडेमध्ये 'निपाह' या व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून या व्हायरसची लागण झालेल्या अनेकांवर सध्या उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारनं याप्रकरणी दखल घेतली आहे. केरळमध्ये डॉक्टरांचं पथक दाखल झाल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली.
डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संस्थेने 'निपाह' व्हायरसमुळे संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केला आहे. पुण्यातल्या नॅशनल इंस्टिस्ट्युट ऑफ वायरॉलॉजीनं ३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर निपाह व्हायरस असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह भारतभर खबरदारी घेण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरत आहे. १९९८ साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणूबाबतची प्रकरणं समोर आली होती. त्यामुळे या विषाणूला 'निपाह' असं नाव देण्यात आलं. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता.२००४ मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यावेळी तिथल्या लोकांनी खजूराच्या झाडापासून मिळणारा द्रवपदार्थ खाल्ल्याचं समोर आलं होतं. भारतातल्या केरळमध्ये प्रथमच 'निपाह' विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.