३०० उठाबशा काढलेल्या विद्यार्थिनीवर केईएममध्ये उपचार?

  • भाग्यश्री भुवड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील काळगोंडवाडीमधल्या एका शाळेतील शिक्षिकेनं विद्यार्थिनीला तब्बल ५०० उठाबशा काढायची शिक्षा सुनावली. ही शिक्षा या मुलीच्या जीवावर बेतली असून प्रमाणापेक्षा जास्त उठाबशा काढल्यामुळे या विद्यार्थीनीचे पाय थरथर कापत आहेत. या विद्यार्थिनीवर आता मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत.

वही आणली नाही म्हणून शिक्षा

कानूर बुद्रुक इथल्या भावेश्वरी संदेश विद्यालयात आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विजया चौगुले ही विद्यार्थिनी २४ नोव्हेंबरला वही घरी विसरली. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवण यांनी विजयाला ५०० उठाबशा काढायची शिक्षा दिली. विजयानं कशाबशा जवळपास ३०० उठाबशा काढल्या, पण त्यानंतर मात्र तिचे पाय लटपटायला लागले.

दोन दिवसांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, त्यामुळे तिला कोल्हापूरातल्या सीपीआर या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण, लवकरच तिला मुंबईत आणून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.

विजयाच्या कुटुंबीयांनी आम्हाला कोल्हापूरवरुन फोन केला होता. त्यानुसार तिचे कुटुंबीय तिला केईएममध्ये आणण्याची शक्यता आहे. ती इथे आली की आम्ही तिला न्यूरोलॉजी विभागात दाखल करुन तिच्यावर उपचार करणार आहोत.

- डाॅ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी मुख्याध्यापिका अश्विनी देवण यांना गुरुवारी अटक केली. भारतीय दंड संहितेतील कलम ३२३, ३२५, ३३६, ३३७ आणि ५०६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मात्र हे जामीनपात्र कलम असल्याने त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या