२ वर्षांनंतर महाराष्ट्रात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

राज्यात बुधवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं यासंदर्भात माहिती दिली आहे.

राज्यात बुधवारी ५४४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. रिकव्हरी रेट ९८.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा असून बुधवारी एकही मृत्यू झाला नाही.

राज्यात १ एप्रिल २०२० नंतर हा पहिला दिवस आहे, ज्यादिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. म्हणजेच तब्बल २ वर्षांनंतर हा दिवस पाहायला मिळाला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात दैनंदिन ४८ हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. आता ही संख्या ५०० ते ७०० वर आली आहे. तर राज्यात दोन हजार ॲक्टिव्ह पेशंट आहेत. त्यामुळे तिसरी लाट जवळजवळ संपल्याची स्थिती आहे, असे असले तरी कोरोना संपला आहे असे समजून चालणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, १४ जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने हॉटेल्स, सिनेमा आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच पर्यटन आणि धार्मिकस्थळेही पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाट्य, सिनेमासह पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

इतर जिल्ह्यात हॉटेल, सिनेमा आणि नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, निर्बंध शिथील करण्यात आले तरी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.


हेही वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या