३० नोव्हेंबपर्यंत राज्यात संपूर्ण लसीकरण ; आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एक जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळं संपुर्ण देशभरात नागरिकांचं मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जातं आहे. अशातच राज्यातील सर्व पात्र नागरिकांना ३० नोव्हेंबपर्यंत कोरोना लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट असल्याचं  सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत टोपे मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते. राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाची गती वाढावी, यासाठी कवच कुंडल व युवा स्वास्थ्य सारखे अभियान राबविण्यात आले.

लसीकरणाची शिबीरे आणि वेळही वाढवली जात आहे. लसीकरणाच्या मोहिमेत आरोग्य, महसूल, नगरविकास, शिक्षण अशा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्रित काम करीत आहेत. लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी विविध क्षेत्रांमधील मान्यवर, धर्मगुरु यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

कोवॅक्सिन लसीच्या २ मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. मात्र कोविशिल्ड लसीच्या २ मात्रांमध्ये ८४ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. कोविशिल्ड लशीच्या २ मात्रा मधील अंतर कमी केले, तर लसीकरणाच्या वेगाला गती देता येईल. याबाबत विचार करण्याची विनंती टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या