मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठीच्या निविदेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यानुसार मंडळाने शुक्रवारी बीडीडीच्या बांधकामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवल्या. पण या निविदा केवळ डिलाईड रोड येथील 35 आणि नायगावमधील 42 इमारतींसाठीच मागवण्यात आल्या आहेत. बीडीडीमधील सर्वात मोठी आणि प्राईम जागेतील वसाहत म्हणजे वरळी. या वरळीला वगळत ही निविदा काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अखिल बीडीडी चाळ भाडेकरु हक्क संरक्षण समितीला यासंबंधी विचारले असता वरळीसाठी मंडळाने नियुक्त केलेल्या आर्किटेक्टविरोधात न्यायालयात खटला दाखल आहे. त्यामुळे वरळीसाठी निविदा काढली नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आर्किटेक्टचा मुद्दा आहे पण हा छोटा मुद्द असून, वरळीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याने, काही परवानग्या मिळणे बाकी असल्याने वरळीला तूर्तास वगळल्याचे स्पष्ट केले आहे. वरळीच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू असून, येत्या काही दिवसातच वरळीसाठीही निविदा काढू असेही झेंडे यांनी सांगितले. रहिवाशांना विश्वासात घेत त्यांच्या मागण्यांनुसार पुनर्विकास करण्याचे आश्वासन सरकारने दिले. पण प्रत्यक्षात म्हाडा मात्र रहिवाशांना अंधारात ठेवत पुनर्विकासाची प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी किरण माने यांनी केला आहे. डिलाईड रोड आणि नायगाव या ज्या दोन चाळींसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्या चाळकऱ्यांचाही या निविदेला विरोध आहे. लवकरच या चाळकऱ्यांची एक बैठक होणार असून, या बैठकीत चाळकरी आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले आहे.