'मेड इन इंडिया' आणि 'स्टार्टअप'चे वारे देशात वेगाने वाहत आहेत. त्यातच आता सायकलनिर्मिती क्षेत्रातील बड्या परदेशी कंपन्या अत्याधुनिक आणि वेगळ्या प्रकारच्या सायकली घेऊन भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत. मग भारतातील सायकल कंपन्या तरी कशा मागे राहतील? त्यामुळे या भारतातील सायकल कंपन्याही नानाविध प्रयोग करत आहेत. नेमके हे प्रयोग काय आहेत?, निर्मितीमागचे विज्ञान, आर्थिक गणित, पर्यावरण संवर्धनाला त्याचा कशाप्रकारे हातभार लागणार? आणि नेहमीच्या वापरातील सायकलपेक्षा वेगळ्या सायकली बनवण्याच्या प्रयोगामागची कहाणी रविवारी 'सायकल कट्टा'वर उलगडण्यात आली. हा 'सायकल कट्टा' रविवार, 4 जून रोजी माटुंगा रोड येथील डी. जी. रुपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
हा सायकल कट्टा सर्वांसाठी मोफत होता. या निमित्ताने अनेकांनी सायकलीशी आपला आलेला संबंध आणि अनुभव उपस्थितांसमोर व्यक्त केले. या सायकल कट्ट्याचे आयोजन पत्रकार अलका धुपकर आणि प्रशांत ननावरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. वाहनांच्या वाढत्या वापरामुळे धुराने होणारे प्रदूषण तसेच पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती भविष्यासाठी किती आवश्यक आहे, यावर रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मुंबई आणि पुण्यातील 8 सायकलप्रेमींनी 2 वर्षांपूर्वी या सायकल कट्ट्याची स्थापना केली. सध्या या सायकल कट्ट्याच्या सदस्यांची संख्या 15 आहे. जनजागृतीसाठी हे सायकल प्रेमी 3 महिन्यातून एकदा वेगवेगळ्या ठिकाणी या सायकलकट्ट्याचे आयोजन करतात.