ठाणे जिल्ह्यात पावसाळी पर्यटनावर जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात जिल्ह्यातील धबधबे, तलाव आणि धरणांच्या परिसरात पर्यटकांना जाता येणार नाही. पर्यटकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि अपघातात जिवीतहानी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटनावर बंदी घातली आहे.
धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करण्यास, मद्य बाळगण्यास, मद्य वाहतूक करण्यास आणि अनाधिकृतरित्या मद्य विक्री करण्यासही बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, महिलांची छेडछाड करणे, पर्यटन स्थळांवर ध्वनी, वायू आणि जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
ही आहेत बंदीची ठिकाणं
येऊर परिसरात असणारे धबधबे, जिल्ह्यातील सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, सिद्धगड, डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, भातसा धरण परिसर, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख, रेतीबंदर, पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळु चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदी किनारा, कळंबे नदी किनारा, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा खोपवली, गोरखगड, सिंगापूर नानेघाट, धसई धरण, आंबेटेबे, मुरबाड आणि कसारा येथील सर्व धबधबे, कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी, भिवंडी नदीनाका, गणेशपूरी नदी परिसर, कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी