गेल्या २४ तासांत मुंबईत झालेल्या झाडे पडण्याच्या अनेक घटनांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. पावसाळ्यापूर्वीची आवश्यक कामे झाली नसल्याचे हेच पुरावे असल्याचा आरोप त्यांनी केला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरील पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले, "गेल्या 24 तासांत मुंबईभर पडलेली झाडे हेच दाखवून देतात की, आम्ही जे सांगत होतो तेच खरे आहे. मुंबईत पावसाळ्यापूर्वीची कामेच झाली नाहीत."
मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी त्या बांगलादेश आणि केंद्रीय गृहमंत्रालयाशी संबंधित मुद्द्यांमध्ये अधिक व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचे कौतुक करत, तुंबलेले नाले, अपूर्ण रस्त्यांची कामे आणि इतर नागरी समस्यांची पाहणी त्यांनी केली असल्याचे सांगितले. तर सत्ताधारी युती नागरिकांपेक्षा त्यांच्या 'आवडत्या कंत्राटदारांनाच' प्राधान्य देत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुंबईसारख्या देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या शहराची अवस्था लाजिरवाणी असल्याचे सांगत, शहराचे प्रशासन प्रभावीपणे कारभार करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच, गेल्या 12 वर्षांत केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही भाजपला एकही शहर आदर्श पद्धतीने विकसित करता आले नसल्याचा दावा करत, "भाजपने ज्या शहरांमध्ये सत्ता चालवली, त्या शहरांमध्ये अव्यवस्था आणि भ्रष्टाचारच वाढला," असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली आहे.
हेही वाचा