मुंबई - मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची लगीनघाई शिवसेनेबरोबरच भाजपानेही सुरु केली होती. त्यामुळे महापालिकेत नगरसेवकांची फोडाफोडी करून सत्ता मिळवायची, नाहीतर विरोधी पक्षात बसायचे. अशी पूर्ण तयारीही भाजपाने केली होती. परंतु आता या दोन्ही भूमिका भाजपा निभावणार आहे. भाजपाने महापौरपदासह सर्वच समित्यांच्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय जाहीर करून शिवसेनेचा महापौर बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एकप्रकारे अशाप्रकारे छुपी युती करतानाच पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याचे जाहीर करत एकाच वेळी सत्तेत आणि विरोधी पक्षात बसण्याची भूमिका भाजप निभावणार आहे.
मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेने विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपाच्या वतीनेही या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा मुंबईत महापौर, उपमहापौर यासह समित्यांमध्ये संख्याबळ समसमान असूनही स्थायी, सुधार, शिक्षण तसेच बेस्ट, एवढेच नव्हे तर प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकाही लढणार नाही हे जाहीर केले.
समित्यांच्या बैठकीत भाजपा किंगमेकर
भाजपाचे संख्याबळ ८४ एवढे झाल्यामुळे स्थायी समितीत शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी दहा सदस्य आहे. याबरोबरच सुधार समिती आणि बेस्ट समितीमध्येही समसमान सदस्य आहेत. परंतु आता त्यामुळे भाजपा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची भूमिका बजावताना दिसणार आहे. प्रशासनाने आणलेल्या कोणत्याही प्रस्तावास शिवसेनेचा विरोध असल्यास अन्य पक्षांच्या मदतीने भाजपा ते मंजूर करणार आणि शिवसेनेचा पाठिंबा असल्यास ते इतर सदस्यांच्या मदतीने तो नामंजूर केला जाणार आहे. त्यामुळे भाजपा ‘किंगमेकर’ व ‘डिसीजन मेकर’च्या भूमिकेत दिसणार आहे.
उत्तरप्रदेशच्या निवडणुकीमुळे 'सेफ झोन'
एका बाजूला राज्यातील सरकार वाचवायचे आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली फॉर्म्युल्याचा वापर केला असता तर उत्तर प्रदेशच्या पुढील दोन टप्प्यातील निवडणुकीतील मतदानावर परिणाम होईल. त्यामुळे पुन्हा एकत्र येण्याऐवजी स्वतंत्रच राहून सर्व पदांचा त्याग करून शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आणि स्वतंत्र राहून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही याची पूर्ण काळजी घेऊन भाजपाने सेफ झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न केला.
…तरीही भाजपा विरोधी पक्षच !
भाजपा विरोधी पक्षात बसणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी भाजपा हा पक्ष विरोधीपक्ष म्हणूनच ओळखला जाणार आहे. महापालिकेच्या अधिनियमानुसार सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत युती अथवा आघाडी व्यतिरिक्त दुसऱ्या क्रमांकावरील मोठा पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून निवडला जातो. त्या पक्षाचाच नेता हा विरोधी पक्षनेता होतो. परंतु जर दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाने विरोधी पक्षनेतेपद न स्वीकारल्यास त्यानंतरच्या पक्षाला विरोधी पक्षनेते देण्याबाबत अधिनियमात कुठेही स्पष्टता नाही. त्यामुळे भाजपालाच विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागणार आहे.