बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठणार?

मलबार हिल - तामिळनाडूतल्या जलीकट्टूनंतर आता राज्यातही बैलगाडी शर्यतींना सुरु करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिलं आहे. तामिळनाडू सरकारने जलीकट्टूवरील बंदी उठवली, त्याप्रमाणे राज्यातील बैल गाडी शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी बैलगाडी संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

राज्यातील सर्व बैल गाडी संघटना बैलगाडी शर्यत सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 'आचार संहिता संपल्यावर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेतच. पेटा संस्थेवर बंदी आणावी, पेटा हटाव संस्कृती टिकाव हा आमचा नारा असून त्या अनुषंगाने 29 तारखेला आंदोलन सुरू करणार आहे. आमच्या या मागणीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे बैल गाडी संघटनेचे बाळासाहेब आरुडे यांनी या वेळी सांगितलं'.

शर्यतीदरम्यान बैलांवर अत्याचार होतात, त्यांना क्रूरपणे वागवलं जात असल्यामुळे केंद्र सरकारने जुलै 2011 मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली. त्यामुळे बैलगाडीच्या शर्यतींवरही बंदी आली. हा वाद पुढे कोर्टात गेला. आपणही या स्पर्धा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील असून, आचारसंहिता असल्याने तूर्तास निर्णय घेता येणार नाही, पण आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या