हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू झालं असून पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याने सरकार आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहून मुख्यमंत्र्यांनी 'ये तो मगरमच्छ के आसू है' असं सांगत विरोधकांवर हल्ला चढवला.
'हे फसवं सरकार आहे. ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी पाठवून देत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले', 'मात्र घोषणांच्या पलीकडे या सरकारनं काही केलं नाही, त्यामुळे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी देत शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे जमा केलेत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं', असं विखे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सभागृहात आणलेला १०० रुपयांचा स्टँप पेपरही मुख्यमंत्र्यांना दाखवला.
विरोधक आक्रमक झालेले पाहून मुख्यमंत्र्यांनी 'ये तो मगरमच्छ के आसू है'.' तुम्ही तुमच्या काळात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलीत. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या केवळ तुमचं पाप आहे. १०० चा स्टँप पेपर काय दाखवता मी हजारच्या स्टँप पेपरवर तुम्हाला लिहून देतो की, जोवर शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळत नाही, तोवर ही योजना बंद होणार नाही', असं म्हणत पलटवार केला.
एकीकडे मुख्यमंत्री विरोधकांना सडेतोड उत्तर देत असताना कामकाज मंत्री गिरीश बापट यांचा देखील पारा चढला. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव उभे राहून विरोध करत असतानाच गिरीश बापट यांनी जाधव यांना बसायला सांगितलं. विरोधकांच्या या गदारोळातच विधेयकं मंजूर करण्यात आली.
दरम्यान सकाळी विधानसभा आणि विधान परिषदेचं काम सुरू होण्याआधीच विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.