देशमुखांवर मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करा - मलिक

नरिमन पॉईंट - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाच्या गाडीत ९१ लाख ५० हजार रूपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केली होती. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून क्लीन चिटही देण्यात आली आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर लढाई लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलीय. ऊस तोड कामगारांचे पैसे असल्याचा खुलासा देशमुखांनी केला. बँकेच्या एका शाखेतून दुसर्‍या शाखेत पैसे पाठवण्यात येत होते. मल्टिस्टेट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देशमुख हा पैसा काळ्याचा पांढरा करत होते. असा आरोप मलिक यांनी केला. सरकारची जबाबदारी होती की त्यांच्यावर पीएमएलएल अंतर्गत मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायले हवे होते. याउलट त्यांची चौकशी त्यांच्याच खात्याच्या एका डेप्युटी रजिस्ट्रारच्या माध्यमातून होणे म्हणजे त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय असंही मलिक यांनी म्हटलंय. कॅश इन हँडच्या नावाखाली करोडो रूपये एक ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवण्याचा उद्योग सुरु होता. ८ दिवसांत त्यांच्याकडे २४ कोटींची ठेवी वाढली असल्याचे देशमुख यांनीच सांगितले आहे. म्हणजे त्यांनी काळा पैसा स्वतःच्या खात्यात दाखवला आहे. हा सगळा प्रकार कुठेतरी काळा पैसा पांढरा करण्यात व्यस्त असलेल्या मंत्री महोदयांना देवेंद्र फडणवीस सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय. भाजपचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आल्याचंही ते म्हणालेत. ईडीच्यामार्फत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात टाकून मंत्रिपद बरखास्त करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केलीय.

पुढील बातमी
इतर बातम्या