'या घटनेला राजकीय रंग देऊ नये' - शरद पवार

इंग्रज आणि पेशवे यांच्यातील लढाईला २०० वर्षे पूर्ण झाल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय भीमा कोरगावमध्ये गर्दी करणार याची प्रशासनाला कल्पना होती. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याची गरज होती असे सांगतानाच, आता या घटनेला कोणताही रंग देऊ नये. येथील प्रकरण वाढवू नये, घडलेला प्रकार अयोग्य असल्याने आता सर्वांनी शांतता बाळगावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

प्रशासनाने काळजी घ्यायला हवी होती

भीमा-कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी आपली भूमिका मांडताना समाजातील सर्वच स्तरातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पवार म्हणाले की, या घटनेविषयी आपण वढू गावातील लोकांशी संवाद साधला. यावेळी पुणे शहरातल्या हिंदूत्ववादी संघटनांनी वढू येथे येऊन चिथावणी दिल्याचं यावेळी गावकऱ्यांनी सांगितलं. वढू येथे बाहेरून आलेल्या लोकांनी गोंधळ केला. अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण स्थानिक लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या लोकांचा या घटनेशी काहीही संबंध नाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे गावकऱ्यांचं म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितलं. या घटनेवर आता शांततेचं आवाहन त्यांनी केले आहे.

'यावर चर्चा करू नका'

जे घडलं त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरू न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार अशोभनिय आहे. यावर पूर्णविराम कसा लागेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करू नये, किंवा चर्चा करू नये. जे काही करायचं असेल ते सामंज्यस्याने करावं," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या