सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि त्यासाठीच्या उपाययोजनांमधून राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी राज्यभरातील शेतकरी विधानभवनावर धडकणार आहेत.
शेतकऱ्यांचा हा लाँग मार्च नाशिकच्या सीबीएस येथून ६ मार्चला सुरू होणार असून १२ मार्चला हे शेतकरी विधानभवनावर धडकणार आहेत. नाशिक ते मुंबई १८० किलोमीटरचा पायी प्रवास करत शेतकरी मुंबईला पोहोचणार असल्याची माहिती किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या ऐतिहासिक अशा लाँग मार्चमध्ये राज्यभरातील लाखो शेतकरी सहभागी होणार आहेत. पोलिसांची कितीही दडपशाही झाली, तरी हे शेतकरी थेट विधानभवनावर धडकणार असल्याचं ढवळे यावेळी म्हणाले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोवर एकही शेतकरी मागे हटणार नाही, असा इशाराही ढवळे यांनी दिला.
शेतकऱ्यांचा हा लाँग मार्च अखिल भारतीय किसानसभेच्या नेतृत्वाखाली निघणार आहे. या मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी सहभाग घ्यावा.
- अजित नवले, सरचिटणीस किसान सभा