“आधी बळकावलेलं काश्मीर परत आणा, कराचीला आपण नंतर जाऊ”

आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीला आपण नंतर जाऊ, असं म्हणत ‘अखंड भारता’च्या भूमिकेचं समर्थन करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर 'कराची स्वीट्स' हे नाव बदला, असा इशारा शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी गेल्या आठवड्यात वांद्र्यातील एका दुकान मालकाला दिला होता. त्यानंतर या दुकान मालकाने दुकानाची पाटी कागदाने झाकून घेतली होती.

त्यावर प्रसारमाध्यमांनी खासदार संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारताच, निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची स्वीट्सची मिठाई मुंबईत (mumbai) ६० सालापासून विकली जात आहे. त्यांचं पाकिस्तानसोबत काहीही देण-घेणं नाही. त्यामुळे केवळ कराची या नावाला आक्षेप असण्याचंही कारण नाही. शिवसेनेची ही अधिकृत भूमिका नाही, असा खुलासा त्यांनी केला होता.

हेही वाचा- ‘कराची स्वीट्स’वरून शिवसेनेतच दुमत!

हाच मुद्दा धरून शिवसेनेला (shiv sena) टोला हाणताना संजय राऊत यांनी आधीच आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला हवं होतं. भाजपपुरतं बोलायचं झाल्यास आम्ही 'अखंड भारत' संकल्पनेवर विश्वास असलेले लोकं आहोत. कराची एक दिवस भारताचा भाग होईल, असा आमचा विश्वास आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

फडणीस यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीला आपण नंतर जाऊ, असं संजय राऊत म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या