सावरकरांची निंदा करणाऱ्यांनी सावरकरांचे साहित्य वाचावे. सावरकर निस्सिम देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांना येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाहीत, अशी घणाघाती टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. सावरकरांचे व्यक्तिमत्त्व हे कुठल्याही उपाध्यांच्या पलिकडचे आहे. म्हणूनच देशवासीयांनी त्यांना 'वीर' ही पदवी दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाण्यात शुक्रवारपासून 29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या साहित्य संमेलनात पहिल्याच दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये उपस्थित होते. त्यांनी भाषणात सावरकरांची महिमा सांगतानाच काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली. सावरकर यांचे वैचारिक साहित्यात योगदान आणि त्यांच्या स्वाभिमानी आणि देशभक्तीचे दाखले त्यांनी यावेळी दिले.