नोटबंदीमुळे 'शेतकरी उपाशी सरकार तुपाशी' - बच्चू कडू

सीएसटी - केंद्र सरकारच्या पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतमालावरही झाला आहे. त्यामुळे 'शेतकरी उपाशी आणि सरकार तुपाशी' अशी टीका प्रहार संस्थेचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर केली आहे. ते मुंबई मराठी पत्रकार संघात 28 नोव्हेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

नोटबंदीचा फायदा हा भाजपाला झाला असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

नोटबंदीचा निर्णय चांगला अाहे. पण त्याचं नियोजन चुकीचं असल्याचं कडू म्हणाले.

याचा सर्वात मोठा फटका शेतकर्‍यांच्या शेतमालावर बसला आहे. नोटबंदीचा कार्यक्रम जर थोडा पुढे ढकलला असता तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा झाला असता.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून भविष्यात ते पाठिंबा देतील अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

शेतकर्‍यांच्या प्रश्न सोडवण्याबाबत सरकार सपशेल अपयशी ठरली आहे. या प्रश्नांबाबत 3 जानेवारी 2017 रोजी मंत्रायलात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. तसंच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 5 जानेवारी 2017 ला विभागीय अायुक्त, अमरावती येथे शेतकर्‍यांसोबत नांगर अंदोलन करणार असल्याचा इशाराही कडू यांनी दिला. 

पुढील बातमी
इतर बातम्या