बागलकरांच्या भविष्याचा निर्णय पुढे ढकलला

इश्वर चिठ्ठी टाकून झालेला नशिबाचा निर्णय मान्य नसल्याचं सांगत शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर न्यायालयात गेले होते. मात्र आता या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायाधीश सुट्टीवर असल्याने या याचिकेवर 20 एप्रिलला सुनावणी होणार होती. मात्र अजून पालिकेकडून कागदपत्रे आली नसल्याने अजून एक आठवड्याचा कालावधी दे्ण्यात यावा, अशी विनंती अतुल शाह यांच्या वकिलाने केली. त्यावर न्यायाधीशांकडून अतुल शाह यांच्या वकिलाला इशारा देण्यात आला. एक आठवड्यात कागदपत्रे जमा केली नाहीत, तर न्यायालय आपल्या परीने जो निर्णय देईल तो मान्य करवा लागेल, असे न्यायालयाने सुनावले. आता पुढची सुनावणी 26 एप्रिलला होणार आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 220 मध्ये शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर आणि भाजपाच्या अतुल शहांना 5 हजार 946 इतकी समसमान मतं पडली होती. दोन्ही उमेदवारांना समान मतं पडल्यानं फेरमतमोजणी करण्यात आली. फेरमतमोजणीतही मतांमध्ये कोणताच फरक न पडल्यानं इश्वर चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. लॉटरी पद्धतीनं भाजपाच्या अतुल शहांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र यावर आक्षेप नोंदवत सुरेंद्र बागलकर यांनी कोर्टात धाव घेतली होती. आता त्यांना पुन्हा वाट पाहावी लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या