'मिठी नदी परिसरातील अनधिकृत बांधकामं हटवा'

वांद्रे - मिठी नदी परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवणे तसंच अधिकृत बांधकामातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी, तसंच नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी दिले.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मिठी नदी आणि मुंबईतील इतर नद्यांच्या प्रदूषणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतिश गवई, महापालिका आयुक्त अजॉय मेहता अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. मिठी नदीच्या परिसरातील 6 किमी अंतरातील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे काम हे ‘एमएमआरडीए’कडे तर 11 किमी अंतरातील काम मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते. मात्र अपूर्णावस्थेत असलेले काम तातडीनं पूर्ण करावे. नदीतील गाळ काढण्यासंदर्भातील कामाचा अहवाल सादर करावा. 67 छोट्या भागांतून प्रदूषित पाणी नदीत सोडले जाते, त्यावर उपाययोजना आखण्यासंदर्भातील अहवालही त्वरित सादर करावा, असे निर्देश रामदास कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पुढील बातमी
इतर बातम्या