कोहिनूर मिल प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे तब्बल साडे आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत. राज यांची शुक्रवारी पुन्हा चौकशी होणार नाही. मात्र, गरज लागल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय, या प्रकरणाशी संबंधित इतरांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कुटुंबासह ईडी कार्यालयात हजर
ईडी कार्यालयातुन बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मीडियाशी कोणताही संवाद साधला नाही, केवळ स्मित हास्य करून ते बाहेर पडले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयात हजर झाले होते. मात्र ईडी कार्यालयात ते एकटेच गेले होते. तब्बल साडे आठ तास राज यांची चौकशी करण्यात आली. यावेळी दिल्लीचे अधिकाऱ्यांनीही ईडी कार्यालयात येऊन राज यांची कसून चौकशी केली.
निवासस्थानाच्या दिशेने रवाना
कोहिनूर मिलच्या व्यवहाराशी संबंधित सर्व माहिती राज यांच्याकडून घेण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी साडे आठ वाजता राज ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडी कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी सर्वांना पाहून हात केला आणि स्मित हास्य केलं. त्यानंतर थेट निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले. त्याचवेळी ईडीचेही काही अधिकारी कार्यालयातून बाहेर पडले.
पुन्हा चौकशी?
राज यांना शुक्रवारी पुन्हा चौकशीला बोलविण्यात येणार आहे का? असा प्रश्न त्यांना करण्यात आला असता ते 'नाही' असं म्हणाले. त्यामुळे राज यांना मोठा दिलासा मिळाल्याचं समजतं.