'मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही'

दादर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग केलेला नाही. ज्या तक्रारी झाल्या आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करेल असे स्पष्टीकरण भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिले. दादर पूर्व येथील वसंत स्मृती येथे सोमवारी अनौपचारिकरित्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.

'ज्यांची 60 जागा लढवायची लायकी नाही. प्रत्येक दिवशी भाजपाच्या 2 ते 3 तक्रारी करण्याचे कार्य ते प्राधान्याने करत असून उद्या सामनाच्या पानावर छापण्यासाठी शिवसेनेला काहीतरी मजकुराची गरज असणार, त्यामुळे ते असे प्रकार करत आहेत' अशी खिल्ली भांडारी यांनी उडवली. त्याचबरोबर 'शिवसेना ही सध्या पराभूत मानसिकतेत आहे, त्यामुळे सतत रडीचा डाव खेळत आहे, आकडे लावणे हे महत्त्वाचे नाही, यात स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही', असेही भांडारी म्हणाले. 'संपादकीय चर्चांना पेड न्यूज ठरवण्याचे कार्य शिवसेना करत आहे, पण मुलाखती हा प्रचाराचा भाग नाही, तसेच मुख्यमंत्री फडणवीस अनुभवी आणि तारतम्य राखून राजकारण करणारे मंत्री आहेत, त्यामुळे शिवसेना केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे कृत्य करत आहे', अशी टीकाही भांडारी यांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या