नववर्ष स्वागतासाठी मनसेची मुख्यमंत्र्यांना 'ही' विनंती

वर्षभर आम्ही तुमचे ऐकले, आता एक दिवस आमचे ऐका, नागरिकांना ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे.

राज्य सरकारने ब्रिटनमध्ये नव्या रूपातील कोरोना आढळल्यामुळे राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. नववर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी स्वागताच्या पार्ट्या होत असतात. त्यामुळे ३१ डिसेंबरला एक दिवस लोकांवरील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

राज्यातील महापालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत नाइट कर्फ्यू लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेने जोरदार टीका केली होती. तुम्ही नाइट पार्ट्या करताय ते चालते, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करत हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका मनसेने केली होती.

या संपूर्ण वर्षात कोरोनामुळे सर्वसामान्यांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यवसायिक त्रस्त आहेत. सरकार जर प्रत्येक वेळा करोनाची भीती दाखवत असेल तर त्यांना अमेरिकेसारखे पॅकेज द्यावे, अशी मागणीही देशपांडे यांनी केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या